Type Here to Get Search Results !

बोर्डा ते विरकुंड रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा - मनसेची मागणी

वणी  : 

         तालुक्यातील बोर्डा ते बोर्डा फाटा व बोर्डा ते विरकुंड रस्त्याच्या सध्याच्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता सध्या इतका खराब झाला आहे की, विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

            रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ये-जा करणे खूप कठीण झाले आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, प्रवासाला लागणारा वेळही खूप जास्त लागत आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली आणि स्थितीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होते. सदर रस्ता हा मारेगाव बांधकाम विभागाच्या आख्यारीतील असल्याने स्थानिक नागरिक आणि या रस्त्याचा वापर करणारे प्रवासी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात आज शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मारेगाव  यांना निवेदन देऊन हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली. जेणे करून  रस्त्याची दुरुस्ती झाल्यास प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल.

           या गंभीर समस्येवर आपण तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा जनतेच्या हितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुस्त बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यातून होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी बोर्डा येथील मनसेचे लक्ष्मण उपरे, प्रतिक पानघाटे, निखिल आस्वले, सचिन बोधाणे, रोशन थाटे, महेश थाटे, प्रशिल घागी, दिनेश डोंगे यांच्या सह गावकरी उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad