नांदेपेरा ते शेलू या रस्त्याची दुरवस्था दूर करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, शेलू येथील एका ग्रामस्थाचा अपघाती मृत्यू झाल्याने दुःखद परिस्थितीचा विचार करून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी वणी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन दिले. नांदेपेरा–शेलू मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या