साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा साहिती’ (मराठी कविता-वाचन) कार्यक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्रजी बरडीया होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण साहित्य अकादेमी, नवी दिल्लीच्या सामान्य परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. त्यानंतर युवा कवींनी आपल्या दर्जेदार, आशयघन आणि अंतर्मुख करणाऱ्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.
पुनीत मातकर (यवतमाळ), मीनाक्षी गोरंटीवार (वणी), अविनाश पोइकर (चंद्रपूर), गीता रायपुरे (चंद्रपूर) आणि दिलीप अलोणे (वणी) या कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. सामाजिक जाणीवा, समकालीन जीवन, मानवी संवेदना आणि बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून प्रभावीपणे उमटले.
उदयोन्मुख तसेच प्रस्थापित कवींना आपल्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि रसिकांना दर्जेदार काव्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून कवितेच्या विविध छटा अनुभवायला मिळाल्या. युवा साहित्यिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
साहित्यिक अभिरुची जपणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. बाळा मालेकर यांनी केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वणीच्या साहित्य क्षेत्राला नवी ऊर्जा देणारा हा उपक्रम साहित्यिक वर्तुळात लक्षवेधी ठरला असून, युवा प्रतिभेला व्यासपीठ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून त्याची चर्चा होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या