शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे विदर्भ नेते तथा विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी वणीत प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. “शिवसेनेचा बाण साधा नाही; दिशा कुठे द्यायची, हे आम्हाला माहीत,” असा इशारा त्यांनी दिला.
वणी परिसरातील सुमारे ६०० एकर जमीन पडीत असून १७५ हून अधिक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आयोजित रोजगार मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रोजगाराच्या अपेक्षेने उमेदवारांची गर्दी झाल्याने मेळावा भरगच्च झाला. मेळाव्याच्या आयोजनासाठी शिवसेना शहरप्रमुख शिवराज पेचे, उपतालुका प्रमुख अनिल उलमाले, धीरज राजूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
‘गटातटाच्या राजकारणाशी मला देणेघेणे नाही’
“माझ्या कार्यक्रमाला कोण आलं आणि कोण आलं नाही, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. गटातटाचं राजकारण मला मान्य नाही,” असे सांगत बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “बच्चू कडूला कोणाचा बाप अडवू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या