गडचिरोली येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला प्रशासकीय व व्यवस्थापकीय निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी केला आहे.
संबंधित आश्रमशाळेतील तब्बल ७९ विद्यार्थिनींना आजही जमिनीवर झोपावे लागत असल्याचा दावा उंबरकर यांनी केला. विद्यार्थिनींसाठी कॉट व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रलंबित असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले. आदिवासी विकास विभागाचा मोठा निधी असताना विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधा का उपलब्ध होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, बाधित विद्यार्थिनींना मोफत व योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच राज्यातील सर्व आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या