
. तालुक्यातील राजूर गावातील गंभीर कचरा समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते फैजल बशीर खान यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी वेकोली राजूर क्षेत्राच्या महाप्रबंधकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी सय्यद मोसिम यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनानुसार, राजूर गावातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून काही कचरा संकलन केंद्रांवरील कचरा तब्बल तीन महिन्यांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
फैजल बशीर खान यांनी कचरा व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित यंत्रणा व ठेकेदारांकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गाव अस्वच्छ झाले असल्याचा आरोप केला. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वेकोली प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांनी वेकोली प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत या कालावधीत गावातील सर्व साचलेला कचरा उचलून व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा वेकोली कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान गावातील साचलेला कचरा प्रतीकात्मक स्वरूपात प्रशासनासमोर आणून निषेध नोंदविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी दानिश काझी, आमीन शेख, वेदांत हिकरे, प्रियांशू आत्राम, अजय आडकिलवार यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या