वणी :
विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, वणी यांच्या वतीने मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' अंतर्गत विधी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), वणी, मा. श्री. पी. एस. जोंधळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), वणी मा. श्री. एस. डी. भोसले उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मा. श्री. एस. डी. भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कायदा आणि न्यायव्यवस्थेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. नागरे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो (POCSO) कायदा, बालसुरक्षा आणि मुलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कायदेशीर सेवांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन केले.
वणी बार असोसिएशनचे सदस्य अॅड. धनंजय आसुटकर यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा हक्क योग्य पद्धतीने वापरावा, असे सांगितले. तसेच वणी बार असोसिएशनच्या सदस्या अॅड. पूजा मत्ते यांनी महिलांची सुरक्षा, महिलांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. पी. एस. जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना समाजविघातक व बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहून आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला. तसेच NALSA आणि DAWN या उपक्रमांची माहिती देत गरजू नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर मदतीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी श्री मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रमेश सुंकूरवार, सचिव मा. श्री. राहुल सुंकूरवार, सदस्य मा. प्राची सुंकूरवार, मार्कंडेय पोदार लर्न स्कूलचे प्राचार्य भूषण अलोणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल कटरे आणि पौर्णिमा चोपणे यांनी केले, तर प्रियंका दानव यांनी आभार प्रदर्शन केले. या विधी जनजागृती सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांच्या हक्क, कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला.


