वणी :
शहरातील विविध भागांत नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण केंद्रे दुरुस्तीअभावी बंद पडल्याने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. ही केंद्रे तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात शहरातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली जलशुद्धीकरण केंद्रे सध्या यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे बंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना विजय चोरडिया म्हणाले की, "शहरातील अनेक नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी या केंद्रांवर अवलंबून आहेत. मात्र केंद्रे बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नगर परिषद प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सर्व बंद केंद्रांची दुरुस्ती करून ती सुरू करावीत."
निवेदनाद्वारे प्रशासनाला लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना विजय चोरडिया यांच्यासह मनीष सुरावार, शुभम गोरे, राहुल मुंजेकर, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, वसुधा ढगे, प्रणोती बांगडे, भाग्यशी वैद्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या