वणी :
दि. १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वणी येथे विदर्भवाद्यांनी ‘काळा दिवस’ पाळत तीव्र आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निदर्शनांमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होताना विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता जबरदस्तीने महाराष्ट्रात विलीन करण्यात आले. गेल्या ६५ वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत असून शेतकरी, युवक, उद्योग आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, कुपोषण, अपुरी सिंचन व्यवस्था, उद्योगांचा अभाव तसेच वाढते वीज दर हे विदर्भातील प्रमुख प्रश्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. “विदर्भाला न्याय द्या”, “स्वतंत्र विदर्भ राज्य द्या” तसेच “महाराष्ट्र दिनाचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, अँड. राहुल खारकर, बाळासाहेब राजुरकर, देवराव धांडे, अजय धोबे, अमित उपाध्ये, नामदेव जनेकर, संजय चिंचोलकर, विकेश पानघाटे, पुंडलिक पथाडे, अशोक चौधरी, वी.भी. टोंगे, गजेंद्र भोयर, प्रभाकर उईके, होमदेव कन्नाके, उद्धव हेपट, कृष्णदेव विधाते, काशिनाथ जेउरकर यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या