शहरात अज्ञात चोरट्याने चलाखीने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर उत्तम धोटे (वय ३०, रा. लालगुडा, वणी) हे शेती व्यवसाय करतात. खत व बियाणे खरेदीसाठी त्यांनी सकाळी सुमारे १० वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, टागोर चौक, वणी येथून ५० हजार रुपये काढले. ही रक्कम प्रत्येकी १०० रुपयांच्या १०० नोटांचे पाच बंडल अशा स्वरूपात खाकी रंगाच्या थैल्यात ठेवून त्यांनी मोटारसायकलच्या हँडलला अडकवली होती.
यानंतर ते गांधी चौकाच्या दिशेने जात असताना महात्मा गांधी पुतळा व चोरडिया ज्वेलर्सजवळील कमानीदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मोटारसायकलच्या सीटवर घाण पडल्याचे सांगितले. त्यामुळे धोटे यांनी मोटारसायकल बाजूला घेऊन सीट स्वच्छ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हँडलला अडकवलेली पैशांची थैली अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
धोटे यांनी परिसरात शोध घेतला, मात्र थैली व रोकड मिळून आली नाही. याप्रकरणी वणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलीसांनी नागरिकांना बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या