तालुक्यातील शिरपूर या गावात मंगळवारी (दि. 31 मार्च) संध्याकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या नशेत आलेल्या एका तरुणाने किरकोळ कारणावरून वाद घालत थेट हिंसाचाराचा मार्ग अवलंबत दोन जणांना गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पानठेल्याजवळ काही नागरिक गप्पा मारत बसले असताना नशेत असलेला तरुण तेथे आला. त्याने कोंबडा घेतल्यावर पैसे नंतर देतो असे सांगून निघून गेला. मात्र काही वेळाने परत येत त्याने “मला काहीच दिले नाही” असा आरोप करत वादाला सुरुवात केली.
वाद चिघळताच संतापलेल्या तरुणाने शिवीगाळ करत अचानक विट उचलून फेकली. ती विट एका व्यक्तीच्या डोक्याला लागून तो जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुसरा व्यक्ती पुढे सरसावला असता, हल्लेखोराने जमिनीवरील दगड उचलून त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या