महाराष्ट्रात रंगपंचमी रंगांच्या उधळणीसाठी ओळखली जाते; मात्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोरी येथे हा सण ‘गोटमार’ या अनोख्या परंपरेने साजरा होतो. सोळाव्या शतकापासून सुरू असलेली ही परंपरा संत गदाजी महाराज यांच्या स्मृतीशी जोडलेली असून श्रद्धा आणि इतिहासाचा ठसा मानली जाते.
लोककथेनुसार, शिवकालीन मंदिरावर झालेल्या लुटारूंच्या हल्ल्याला गावकऱ्यांनी दगडांनी प्रतिकार केला. त्याच घटनेच्या स्मरणार्थ शिमग्याच्या दिवशी गोटमार खेळली जाते.
धुलीवंदनानंतर सकाळी प्रथम कवडीचा प्रतीकात्मक खेळ होतो. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास संत गदाजी महाराज मंदिरावर दगडांचा वर्षाव करून गोटमारला सुरुवात होते. दोन गट एकमेकांवर दगडफेक करतात. जखमी झालेल्यांना मंदिरात नेऊन प्राथमिक उपचार केले जातात. खेळ श्रद्धेच्या वातावरणात पार पडतो.
यंदा फाल्गुन पौर्णिमेला, ३ मार्च २०२६ रोजी यात्रेची सुरुवात काकड आरतीने होईल. २८ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान शिवमहापुराण व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गदाजी महाराज संस्थान, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या नियोजनातून हा उत्सव पार पडणार असून राज्यासह मध्य प्रदेश व तेलंगणातून भाविक उपस्थित राहतात.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या