वणी :
तालुक्यातील उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन संपादनातील विलंबामुळे 21 फेब्रुवारी रोजी बेलोरा चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे कोळसा वाहतूक ठप्प झाली असून वणी–चंद्रपूर–घुग्घुस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रस्त्यावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
उकणी खंड 1 परिसरातील सुमारे 85% जमिनी आधीच संपादित झाल्या असल्या तरी उर्वरित 170 शेतकऱ्यांची सुमारे 600 एकर जमीन अद्याप प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक होऊन शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
संजय खाडे यांनी इशारा दिला की, जमीन संपादन, पुनर्वसन, नोकऱ्या व नुकसानभरपाईचे प्रश्न लवकर सोडवले नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या