वणी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ओम नगर वस्ती येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनात समाजपरिवर्तनाचा ठाम संदेश देण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी “हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीव आणि पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाज घडवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर नागरिकांना हक्क मिळाले असले तरी कर्तव्यांबाबत उदासीनता दिसून येते. स्वच्छता राखणे, मतदान करणे, कर न चुकवणे, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुटुंबव्यवस्था ढासळत असून संवादाचा अभाव ही चिंतेची बाब आहे. यासाठी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संवर्धनावर भर देणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळून जलसंधारणासारख्या उपक्रमांद्वारे भविष्यातील संकटांवर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले.
या संमेलनात संत दिव्यानंद खत्री यांनी आशीर्वचन देताना संघाच्या 1925 पासूनच्या राष्ट्रनिर्माण कार्याचा गौरव केला. “संघ ही केवळ संस्था नसून विचारधारा आहे. व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्म आणि चरित्रावर ठरते,” असे ते म्हणाले. हिंदू ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात युवा उद्योजक हर्षल महादेव नक्षने यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनापूर्वी महिलांची भव्य कलश यात्रा काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शरद इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन रवी चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन अरुण लाकडे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ओम नगर वस्तीतील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या