चंद्रपूर :
डॉ. अशोक जीवतोडे व त्यांचा परिवार सातत्याने बहुजन समाजाला घेवून कार्य करीत आहे. हा परीवार बहुजन समाजाच्या उत्थानाकरीता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व ओबीसी चळवळीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बहुजन समाजाला या परिवाराच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शिक्षण व सामाजिक चळवळ हा त्यातील केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे त्यांना बहुजन नेतृत्व म्हणून संबोधता येईल. शिक्षण, सामाजिक व चळवळीच्या क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात त्यांची उपस्थिती दखलपात्र राहिली आहे. राजकीय क्षेत्रातून संवैधानिक पदावर जाता आले तर बहुजनांचे कार्य करणे सोपे जाईल, अधिक ताकदीने पूर्व विदर्भात बहुजनांकरीता संधी उपलब्ध करून देता येईल, असे त्यांना सतत वाटते. शैक्षणिक चळवळ, ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ, या चळवळीतील त्यांची सक्रियता त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देते.
पश्चिम महाराष्ट्रातील कर्मवीर भाऊराव पाटील, पश्चिम विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या खालोखाल शैक्षणिक क्षेत्रात पूर्व विदर्भात माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी शैक्षणिक कार्यात भरीव काम केले व या परिसरातील घराघरात शिक्षण पोहोचविले. त्या कुटुंबात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा जन्म झाला. एम. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र), एम. फिल., एम. एड., पी. एच. डी. (शिक्षण व वाणिज्य) असे शिक्षण घेवून शिक्षकी पेशात पदार्पण करून १९९२ पासून तर आजतागायत ते पूर्व विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना सामाजिक
जवाबदारीचे भान ठेवून त्यांनी कुणबी, शेतकरी समाजाला एकत्र करण्याचे काम जानेवारी २००८ मध्ये केले व हे कार्य समाजाची व जनतेची स्व. श्रीहरी जीवतोडे यांच्यावर असलेली श्रध्दा व निष्ठा यामुळे डॉ. अशोक जीवतोडे हे करू शकले. विदर्भ राज्याचा ध्यास घेवून अॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी जनजागृती व व्याख्याने आयोजित करण्यात आले व या कार्यात लोकांचा सहभाग वाढला. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी राष्ट्रीयस्तरावर ओबीसी समाजाचे आंदोलन उभे केले.
या राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी समाजाच्या कार्यात
कधी देवेंद्र फडणवीस, हंसराज अहिर, शरद यादव, बंडारू दत्तात्रय, तेजस्वी यादव, इंद्रजित सिंग, हुकूम देव नारायण सिंह व देश पातळीवरील अनेक राजकीय तथा सामाजिक नेत्यांसोबत सहभाग नोंदविला. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अजात शत्रू म्हणून विदर्भातील सुपरिचित असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अशोक जीवतोडे होय.
भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारांना मदत करून निवडून आणण्याचे प्रयत्न डॉ जीवतोडे यांनी केले. २०१९ मधे खूप कमी मतांनी बीजेपीचे हंसराज अहिर हे पराजित झाले, त्यांच्यासोबत डॉ. अशोक जीवतोडे हेच होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकरीता पक्षाने जवाबदारी दिल्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ओबीसी चळवळीत व भारतीय जनता पक्षात चांगले कार्य करूनही त्यांना राजकीय संधी मिळाली नाही. मात्र ते काम करीत राहिले. समाजकारण, शैक्षणिक व राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला. थनोजे कुणबी शेतकरी समाज एकत्रीकरण, विदर्भ विकासाचा ध्यास घेवून विविध कार्यक्रम तथा आंदोलन आयोजित करून जनतेला विदर्भ विकासाचे महत्व पटवून देणे, ओबीसी समाजाला एकत्र आणण्याची मोहीम राबवून ओबीसींच्या संविधानिक मागण्यांसाठी लढा उभा केला व आता पर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून २४ मागण्यांची पूर्तता करून शासन निर्णय काढून घेतले, हे ओबीसी चळवळीचे यश आहे.
डॉ. अशोक जीवतोडे हे आपले वडील स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना राजकीय गुरु मानतात. राजकीय क्षेत्राबाबत डॉ. अशोक जीवतोडे यांचे विचार स्पष्ट आहेत. समाजाची अविरत सेवा करीत राहिले पाहिजे. तथा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जनतेची कामे केलीच पाहिजे. पक्ष व कार्यकर्त्यांना मोठे केले म्हणजे नेता आपोआप मोठा होतो, असे त्यांना वाटते. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने जवळजवळ सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने राजकीय क्षेत्रात देखील ते अजात शत्रू म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यात नकारात्मक असे काहीच दिसून येत नाहीच. चंद्रपूर, वणी, आर्णी हे लोकसभा क्षेत्र बहुजन बहुल असल्याने लोकसभा २०२४ चा प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा उमेदवार हा याच बहुजन समाजाचा असावा अन्यथा राजकीय पक्षाला दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून आणणे कठीण जाईल, असे डॉ. अशोक जीवतोडे समजतात.
शब्दांकन
प्रा. रविकांत वरारकर, भद्रावती
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या