प्रतिनिधी/वर्धा(मंगेश राऊत) :
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, उच्च रक्तदाब, पक्षाघात, हृदयविकार, कर्करोग यासारखे गंभीर आजार होत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असल्यामुळे तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक आहे.
देशामध्ये मुख कर्करोग होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या वापरामुळे तंबाखू न वापरणाऱ्यांनासुद्धा धोका निर्माण होत असून, धूम्रपान करणाऱ्यांनी सोडलेला धूर श्वासाद्वारे घेतल्याने इतरांना सुद्धा आजार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी केले आहे.
तंबाखू सेवनाने अकाली मृत्यू होतो. त्यामुळे कुटुंबावरदेखील परिणाम होऊन आर्थिक विकासात घसरण होत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असून, ३१ मे तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू सेवन न करण्याची शपथ घ्यावी व तंबाखूचे सेवन करू नये.
'तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण' हे यावर्षीच्या तंबाखू नकार दिनाचे घोषवाक्य असून, ३१ मे २०२४ पर्यंत हे विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या