शेतकरी व कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटनांनी १० ऑगस्ट रोजी देशव्यापी जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वणी व निलजई येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व आयटकसह विविध कामगार संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विधानसभा नेते कॉ. अनिल हेपट, जिल्हासचिव कॉ. अनिल घाटे व तालुकासचिव कॉ. मोरेश्वर कुंटलवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात चार श्रमसंहिता रद्द करून जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, आशा कर्मचाऱ्यांना किमान २५ हजार रुपये मासिक वेतन, तर गटप्रवर्तकांना ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे, आशा वर्कर्सवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकू नये, तसेच आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या कामानुसारच त्यांच्याकडून काम करून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना ईएसआयचा लाभ मिळावा, शालेय पोषण आहार कर्मचारी, मोलकरीण तसेच राष्ट्रीय अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान २० हजार रुपये वेतन देऊन पेन्शन योजना लागू करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच वेकोली कामगारांच्या विविध समस्या वेकोली प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात, यांसह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या