स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आणि “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत वणी शहरात देशभक्त नागरिकांद्वारे दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा आणि वणी शहरातील विविध शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संस्थांचा उत्स्फूर्त अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याचा अभिमान व्यक्त करत विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
वणी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय संस्था, निवृत्त सैनिक, विविध बचत गटाच्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणांनी शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले, जवळपास २५०० जणांनी यात सहभाग नोंदविला.
ही तिरंगा रॅली विश्रामगृह वणी येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लोकमान्य टिळक चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पार पडली.
रॅलीदरम्यान नागरिकांनी तिरंग्याबद्दलचा अभिमान आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. उल्लेखनीय बाब म्हणजे रॅली मधे युवकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला व राष्ट्रप्रेम व्यक्त केले
रॅलीदरम्यान विविध सामाजिक संघटना, जैन समाज ची श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था वणी, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी, विविध व्यापारी बांधव यांनी जागोजागी पाण्याचे आणि बिस्कीट चे वाटप केले तसेच नागरिकांनी रॅलीदरम्यान पुष्पवृष्टी करून रॅली चे स्वागत केले.
उल्लेखनीय म्हणजे या रॅलीदरम्यान वणी पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आणि त्यांनी सुद्धा यात सहभाग नोंदवला. नगर परिषद वणी चे सफाई कर्मचारी यांनी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली.
रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजन आणि नियोजीत पद्धतीने मार्गक्रमण आणि रॅली चे मागे नगर परिषद वणी चे सफाई कर्मचारी हे सफाई करीत होते हे महत्वाचे. रॅली चे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सुद्धा एकत्रित येऊन सहभाग नोंदवला. रॅली नंतर आयोजकानी सर्वांकरिता विश्रामगृह वणी येथे नास्त्याची व्यवस्था केली होती.
या ऐतिहासिक आणि देशभक्तीपर उपक्रमाला वणीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व शाळा-महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस, सर्व सन्माननीय पत्रकार तसेच सर्व सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“तिरंगा आहे अभिमान, ठेवू त्याचा सदैव मान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे वणी शहरात देशभक्तीची लहर निर्माण झाली.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या