वणी : कोलार व पिंपरी या खदानी मुळे गावकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबत मनसेचे राजू उंबरकर यांनी वेकोली क्षेत्रीय महाप्रबंधक यु.जी. गुप्ता यांची भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली.
वणी कार्यक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कोलार व पिंपरी या गावाजवळ कोलार - पिंपरी ही खदान आहे. या खादानीतून दिवसाकाठी हजारो टन कोळसा उत्पादित केला जातो. परंतु सदर कोळसा उत्पादित करत असताना याचा फटका व दुष्परिणाम आजूबाजुच्या गवांना होत आहे. सदर खदानीत कोळसा काढण्यासाठी ब्लास्टिंग घडवून आणतात त्यामुळे गावातील सर्व घरांना तडे जाऊन भिंती कोसळतात, घराची छपरे पडतात. तर अनेक कच्चे बांधकाम जमीनदोस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वास्तव्यास असलेल्या लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तर या आवाजामुळे अनेकाना हृदयाचे आजार, कानाचे आजार, उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, डोळ्यांचे आजार उद्भवत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
२०१३ पासून यासंदर्भात ग्रामस्थांनी गावच्या पुनर्वसनासाठी मागणी केली होती परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसून अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा अन्यथा या सर्व मागण्यांना घेऊन ग्रामस्थांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा उंबरकर यांनी दिला आहे. या आंदोलन दरम्यान काही घडल्यास याला वेकोली सर्वस्वी जबाबदार असेल असेही उंबरकर यांनी सांगितले.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात उंबरकर यांनी चर्चा केली असता क्षत्रिय महाप्रबंधक यु.जी. गुप्ता यांनी याबद्दल सकारात्मकता दर्शवून यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोलार व पिंपरी येथील समस्त महीला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या