सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र कॅशलेस व्यवहार करण्यात येत आहेत. याला एस.टी. महामंडळ अपवाद राहिले होते. त्यामुळे अनेकदा सुट्या पैशांचा प्रश्न, तसेच फाटक्या नोटांबाबत वाद होत होता. बहुतांशी प्रवासी अँड्रॉईड मोबाईल वापरत असल्यामुळे डिजिटल सेवा देण्याबाबत प्रवाशांकडून मागणी होत होती. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही मागणी मान्य करून नवीन अँड्रॉईड ईटी जाय मशिनद्वारे यूपीआय पेमेंटबाबत आदेश दिले आहेत.
एस.टी. महामंडळाकडून प्रवाशांना आधुनिक सेवासुविधेचा लाभ देण्यासाठी धडपड सुरू आहे. यामध्ये अत्याधुनिक बसेसमुळे सुखद प्रवास करणे सोपे झाले आहे. अशात आता तिकीटदेखील कॅशलेस मिळत असल्याने तिकिटाचे पैसे सोबत घेऊन फिरायची कटकट संपणार आहे. केंद्राच्या डिजिटल इंडिया योजनेतून सध्या मोबाईल पेमेंटमधून व्यवहार करण्याचे काम सुरू आहे. बँकिंग व्यवस्थेनेदेखील कॅशलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिल्याने प्रवासात याचा फायदा होणार आहे. प्रवासात कोठेही गरजेनुसार ई- पेमेंट करण्यास मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या