वणी, शुभम कडू : माजी आमदार व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पिकविमाच्या बाबतीत सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
वणी तालुक्यातील २१ हजार १४१ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. त्यापैकी केवळ तीन हजार ५०० शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झालेली आहे. त्यातही काही शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण मराठवाड्यातील ९३ युवकांनी केले, तेच संशयास्पद असल्याचे नांदेकर यांनी स्पष्ट केले. एकाही सर्वेक्षण अहवालावर कृषी विभागाच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. कृषी विभागाला अंधारात ठेवून केलेले सर्वेक्षण विश्वासार्ह कसे, असा प्रश्नही नांदेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार ३४१ शेतकरी पीकविम्यापासून अजूनही वंचित आहेत. नुकसानीचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी आता अनेक शेतात पिकच राहिले नाहीत, तर पुन्हा सर्वेक्षण होणार कसे, शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम द्यावी, अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या